अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शिर्डी येथील चार भिक्षेकर्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक बोरसे, सारंगधर वाघमारे, प्रवीण घोरपडे, इसाक शेख अशी या भिक्षेकर्यांची नावे आहेत. त्यांना विसापूर (ता. श्रीगोंदे) येथील बेगर होममध्ये ठेवण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय आणि विसापूर बेगर होम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या भिक्षेकर्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. दरम्यान आणखी सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
शिर्डी येथे देवस्थानच्या दोन कर्मचार्यांचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यानंतर शिर्डी येथील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिस प्रशासनाने येथील अवैध व्यावसायिकांच्या विरुद्ध कोंबिंग ऑपरेशन राबविले. त्यात भिक्षेकर्यांचा प्रश्न देखील समोर आला. भिक्षेकर्यांमुळे शिर्डीतील गुन्हेगारी वाढत असल्याचे आरोप झाले.
त्यामुळे पोलिस प्रशासन आणि नगर परिषदेने भिक्षेकर्यांच्या विरुद्ध कारवाईची भूमिका घेतली. भाविकांना अडवून, त्यांच्याकडून पैसे घेऊन नशा करणार्या ६० पुरुष व १२ महिला, अशा एकूण ७२ भिक्षेकर्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले. या भिक्षेकर्यांची आरोग्य तपासणी करत, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने विसापूर (ता. श्रीगोंदे) येथील बेगर होममध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्यापैकी दहा भिक्षेकर्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी रविवारी (ता. ६) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना सोमवारी (ता. ७) एक व मंगळवारी (ता.८) तीन, अशा चार भिक्षेकर्यांचा मृत्यू झाला. या घटनेची काही सामाजिक संघटनांनी गंभीर दखल घेतली आहे.
हात बांधून उपचार
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या या भिक्षेकर्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसने होती. त्यामुळे त्यांना विविध आजारांनी ग्रासलेले होते. व्यसनाधीनतेमुळे हे भिक्षेकरी उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांचे हात बांधण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सरू होते. परंतु ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. आणखी सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
भिक्षेकरांचा मृत्यू नव्हे हत्या ः खा. लंके
शिर्डी येथे भिक्षा मागून जगणार्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले. त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील २ दिवसात ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला.
खासदार लंके यांनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्बेतीची विचारपूस केली. त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले. या १० भिक्षुकांपैकी ३ जण रुग्णालयातून पळून गेले, या वेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते. १० भिक्षुकांना रुग्णालयात आणल गेल त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का? असा प्रश्न देखील उपस्थित केला. तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कैमरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी यावेळी केली.
एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंके यांनी उपस्थित केला.