राहाता । नगर सहयाद्री:-
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. हे अभिमानास्पद असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला पाठबळ देणारा आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
वाकडी येथे माध्यमांशी बोलताना ना. विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४ साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला हा सन्मान प्राप्त झाला आहे.
जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता, तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे. धरण सुरक्षा, जलसंवर्धन, सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर या सर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुरस्कारामागे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विभागाचा गौरव म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेले पाठबळ असून विभागातील सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळवण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.



