श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुयातील पारगाव सुद्रिक येथील प्रगतिशील युवा शेतकरी सुनील बबन जगताप यांच्या द्राक्षबागेतील मंडप कोसळून सुमारे ४५ ते ५० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
जगताप यांची पारगाव-लोणी व्यंकनाथ रोडलगत गट क्रमांक ३५५ मध्ये सुमारे तीन एकर क्षेत्रावर माणिक चमन’ या संकरित वाणाची द्राक्ष बाग आहे. १२ ते १५ दिवसांत द्राक्ष काढणीस येणार असताना बागेवर सुमारे ८० ते ९० टन द्राक्षांचा बोजा होता. वजनाचा ताण न सहन झाल्याने मंडपाचे अँगल वाकून संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली. या घटनेत संपूर्ण बागेचे मोठे नुकसान झाले असून, त्याची अंदाजे किंमत ४५ ते ५० लाख रुपये इतकी आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील शेतकरी बांधवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व नुकसान पाहून हळहळ व्यक्त केली. पंचनामा करून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सुनील बबन जगताप हे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब महादू जगताप यांचे पुतणे असून, आधुनिक शेतीत ते आघाडीवर आहेत. पारगाव सुद्रिक हे आधुनिक शेतीसाठी ओळखले जाते आणि सुनील जगताप यांनी आपली द्राक्ष बाग आधुनिक पद्धतीने विकसित केली होती. मात्र एका क्षणात उद्भवलेल्या या दुर्घटनेने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.