श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यात खरिपातील मका पीक जोमात येत असतानाच लष्करी अळीच्या प्रकोपामुळे हे पीक कोमेजण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. मागील आठवड्यात झालेल्या हलक्या सरींमुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले, तरी अळीच्या हल्ल्याने मका पीक पुन्हा संकटात सापडले आहे.
श्रीगोंदा तालुक्यात यंदा ११,२०२ हेक्टरवर मका पीक तसेच ३,००७ हेक्टरवर चाऱ्यासाठी पेरणी झाली आहे. शेतकरी कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या मका पिकाकडे वळले आहेत. मात्र लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. खत, बियाणे व औषधांचे दर आधीच गगनाला भिडलेले आहे.
आता कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण यानंतरही पीक योग्य भावाने विकले गेले नाही, तर शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी शेतकऱ्यांना रासायनिक औषधांची आलटून पालटून फवारणी करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांची व्यथा…
मका पिकवणे आमच्या हातात आहे, पण बाजारभाव आमच्या हातात नाही,” अशी भावना घुगलवडगाव येथील शेतकरी बाळासाहेब चव्हाण, दादा ननवरे व मारुती भोसले यांनी व्यक्त केली. आम्ही अळीपासून पीक वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत, पण भाव मिळणार का याची शाश्वती नाही,असेही ते म्हणाले.
किड नियंत्रणासाठी उपाययोजना
थायोमीधोक्झाम १२.६% + लेम्बाडा सायहॅलोथ्रिन ९.५% – ५ मि.ली / १० लिटर पाणी
स्पिनेटोइस ११.७% – ४ मि.ली / १० लिटर पाणी
क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५% – ४ मि.ली / १० लिटर पाणी
हे औषधे आलटून फवारल्यास अळीचे नियंत्रण शक्य असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.