पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कासारे, कर्जुले हर्या, वडगाव सावताळ, तिखोल, काकणेवाडी, गारगुंडी, ढोकी, कान्हूर पठार या गावांमध्ये मे महिन्याच्या मध्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आणि मे अखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेकांनी बाजरी पिकाची पेरणी केली. मात्र, खोट्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह निराशेत बदलला आहे. पेरलेल्या बाजरीचे पीक उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
या भागातील शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात खोट्या बियाण्यामुळे त्यांचे नुकसान अधिक गंभीर झाले आहे. बाजरी पिकासाठी लागलेले पैसे, मेहनत आणि वेळ वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे, खत आणि मजुरीसाठी खर्च करावा लागणार आहे. ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे खोट्या बियाण्याची तक्रार नोंदवली असून, दोषींवर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, बियाणे खरेदी करताना बिल आणि पॅकिंग तपासण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई न झाल्यास अशा घटना वारंवार घडत राहतील. या संकटामुळे शेतकरी चिंतेत असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. खोट्या बियाण्याच्या या समस्येमुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळला असून, त्यांना आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.
कांदा बियाणे विक्रीत एजंटचा सुळसुळाट
टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ या परिसरामध्ये कांदा बियाणे विक्री करणारे एजंट काम करत असून कांदा बियाणे चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे निदर्शनास येत आहे. विक्री होत असलेले कांदा बियाणे हे खात्रीशीर आहे की नाही हे सांगता येणे अवघड आहे कृषी विभागाने अशा एजंट लोकांना आळा घालून कारवाई करावी.