Maharashtra Crime: सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिचा जागीच खून केला. इतक्यावरच न थांबता, दोन्ही लहान मुलांवरही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही मुले आणि आरोपी पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत महिलेचं नाव पल्लवी तानाजी उबाळे (वय अंदाजे ३०) असं असून तानाजी उबाळे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तानाजी उबाळे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. गेल्या काही काळापासून या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. बुधवारी पहाटे पुन्हा एकदा झालेल्या वादाचं रूपांतर हिंसक झटापटीत झालं आणि संतप्त तानाजीने धारधार शस्त्राने पत्नीवर हल्ला चढवला.
हल्ल्यात पल्लवी गंभीर जखमी झाली आणि ती जागीच मरण पावली. हल्ल्यावेळी तिची दोन लहान मुले तिला वाचवण्यासाठी धावली असता, तानाजीने त्यांच्यावरही हल्ला केला. पल्लवीने प्रतिकार केल्याने झालेल्या झटापटीत तानाजी देखील जखमी झाला. सध्या दोन्ही मुलावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.