मुंबई । नगर सहयाद्री :-
अमिताभ बच्चन यांचे जावई आणि प्रसिद्ध उद्योजक निखिल नंदा यांच्यावर उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील दातागंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांवरही फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी दातागंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ जितेंद्र सिंह दातागंज येथे जय किसान ट्रेडर्स नावाने ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता.
ज्ञानेंद्र यांच्या तक्रारीनुसार, ट्रॅक्टर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जितेंद्रवर विक्री वाढवण्याचा जबरदस्त ताण टाकला. यामध्ये एरिया मॅनेजर आशिष बलियान , सेल्स मॅनेजर सुमित राघव, यूपी हेड दिनेश पंत, फायनान्स कलेक्शन अधिकारी पंकज भास्कर, सेल्स मॅनेजर अमित पंत, सेल्स हेड नीरज मेहरा, सीईओ निखिल नंदा आणि शाहजहानपूर डीलर शिशांत गुप्ता यांचा समावेश आहे.
जितेंद्रला विक्री न झाल्यास एजन्सीचे परवाना रद्द करण्याची तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली जात होती. या तणावामुळे जितेंद्रने आपल्या कुटुंबीयांसमोर आपली व्यथा अनेकदा मांडली होती. नोव्हेंबर 21 रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेवटच्या वेळी जितेंद्रच्या एजन्सीला भेट दिली आणि त्याला मानसिक त्रास दिला. त्यानंतर नोव्हेंबर 22 रोजी जितेंद्रने आत्महत्या केली. परिवाराने पोलिसांकडे तक्रार केली, मात्र कारवाई झाली नाही, असा आरोप ज्ञानेंद्र यांनी केला आहे.
तक्रारीचा तपास करत असताना, कोर्टाच्या आदेशावरून पोलिसांनी कंपनीचे सीईओ निखिल नंदा, यूपी हेड दिनेश पंत, एरिया मॅनेजर, सेल्स मॅनेजर आणि इतर अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती समाजमाध्यमांवर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरत आहे. आता याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी होणार याकडे लक्ष लागले आहे.