मुंबई । नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत.
शरद पवार साताऱ्यात गुरुवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. तर आज शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे दोघे एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी साताऱ्यात पक्षबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि कार्यक्रमांना उपस्थिती असा दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिन्यात दुसऱ्यांदा आयोजित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे ही त्यांची इच्छा आहे. याबाबत अनेकांनी व्यक्तिशः इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता या प्रक्रियेपासून आपण अलिप्त असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या या वक्तव्याचे स्वागत केले तर अनेक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.