Maharashtra Crime News: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पवनचक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने खळबळ उडाली आहे.
आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. तर या घटनेने मस्साजोग गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून तोडफोड केली. त्यानंतर संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात आज दुपारनंतर दाखल करण्यात आली होती.
मात्र काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावाकरी आक्रमक झाले आहेत.. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली जात आहे.
पवनचक्कीच्या वाद
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. तर हा खून मस्साजोग येथील पवनचक्कीच्या वादातून आणि खंडणीच्या वादातून झाला आहे. याविषयी मी पोलीस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना फोन केला, मात्र ते देखील माझा फोन उचलत नाहीत. असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. मी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला, पोलीस अधीक्षकांना फोन केला, मात्र ते माझा फोन घेत नाहीत.. जे कोणी दोषी आहेत, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. कॉल ट्रेस करून आरोपींवर कारवाई करा. राजकारणाची प्रवृत्ती याच्या पाठीमागे आहे.. कोणी सत्तेत येत असेल आणि ते खून करत असतील, तर ती बाब अत्यंत निंदणीय आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.