अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आपल्याकडे आठवड्यातून शनिवारी वीज नसते याची आम्हाला सवय आहे. त्यानुसार आम्ही नगरवासीय आमची मानसिकता करीत असतो. अन् ही तयारी ठेवायलाच हवी. अहिल्यानगर शहरातील अकार्यक्षम वीज मंडळ कोणाच्या आशीर्वादाने शहरवासीयांना दररोज अश्मयुगात घेऊन जातंय? असा सवाल माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते जयंत येलूलकर यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
हल्ली तर दररोज केव्हाही वीज गायब होत असते. शहरात अंधाराचे साम्राज्य असते. याचा फटका नगरवासीयांना रोजच बसत असतो. विशेषतः विद्यार्थ्यांना… शहरातील वीज मंडळ ज्या पद्धतीने शहराला अंधारात घेऊन जातंय अशी परिस्थिती इतर कोणत्याही शहराची नसेल, इतका अकार्यक्षम वीज मंडळाचा स्टाफ कोणत्याही जिल्ह्यात नसेल, असे श्री. येलूलकर यांनी पत्रात म्हटले आहे. गलेलठ्ठ पगार, शासनाच्या सुविधा आणि लाचार, हतबल, सहनशील नगरकर याचा गैरफायदा येथील जबाबदार अधिकारी रोज घेत आहेत. हे भयानक आहे.
आपण सगळे आधुनिक जगात आहोत. एकतर यांचे सगळे फोन बंद करून ठेवलेले. बिनधास्त स्टाफ. जणू काही आमच्या शहरावर हे लोक उपकार करीत आहेत, असे यांच्या बोलण्यातून कायमच जाणवते. यांचा गॉडफादर नक्कीच कोणीतरी असावा नाहीतर हे लोक इतक्या अकार्यक्षम पणाने वागू शकत नाहीत. सावेडी भागात तर दोन दोन तास वीज गायब असते, ही शोकांतिका आहेच व अन्यायही आहे. वीज नसल्यामुळे या भागात का नाही चोऱ्या, मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार राजरोस चालणार! यांना कोणी जाब विचारणारा कोणीच नाही का? या संदर्भात आपण गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती जयंत येलूलकर यांनी आमदार संग्राम जगताप यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.