श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी संपन्न होत असून,श्रीरामपूरकर नागरीकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा ऐतिहासिक सोहळ्यास शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केले.
संगमनेर–श्रीरामपूर–नेवासा मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आला असून, श्रीरामपूरकरांच्या मनामनात नवचैतन्य निर्माण करणारा आणि शिवचरित्राची प्रेरणा देणारे स्मारक असल्याचे विखे पाटील म्हणाले.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन रविवार दि.२ नोव्हेबर २०२५ रोजी दुपारी ४वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील भूषवणार आहेत.
या प्रसंगी शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि लोकसेवेच्या प्रेरणेतून उभारलेला हा पुतळा श्रीरामपूरच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रत्येक पिढीला राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि लोकसेवेची दिशा मिळते. श्रीरामपूरसारख्या ऐतिहासिक शहरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्मारकामुळे भावी पिढ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळत राहील. या लोकार्पण सोहळ्यासाठी समस्त शिवप्रेमी श्रीरामपूरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.



