अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने एका 70 वर्षीय वृद्धाचा गाळात अडकल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना दिनांक 15 रोजी सकाळी दहा वाजता हिंगणगाव येथील पानसरे वस्ती येथील बंधाऱ्यांमध्ये घडली. हिंगणगाव तालुका अहिल्यानगर येथील विलास जगन्नाथ पानसरे (वय -57) हे घरापासून शेतीकडे रोज या बंधाऱ्यावरून जात असतात.
या बंधाऱ्यावर असणाऱ्या शेवाळावर त्यांचा पाय घसरून ते खोल अशा पंधरा फूट बंधाऱ्यांमध्ये पडले. या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या गाळात अडकून बसल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व विलास पानसरे यांचा मृतदेह बाहेर काढला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार यादव दळवी, मंडलाधिकारी प्रताप कळसे, तलाठी विनायक दिक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर दिलीप पवार, सरपंच पोपट ढगे यांनी भेट दिली.