मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यभरात आज दहीहंडीनिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
ठाण्यासह मुंबईतील दहीहंडी उत्सव नेहमीच चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर लावण्यास कोण सरस ठरणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आज मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस असूनही गोविंदा पथकांचा जराही उत्साह कमी झालेला नाही.
विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पालिकेच्या निवडणुकी निमित्त अनेक राजकीय पक्षाकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी राजकीय नेते व सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार आहेत. महिला गोविंद पथक हे या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकातील शिंदे-ठाकरे गटाच्या समोरासमोरील दहीहंड्या या विशेष आकर्षण ठरणार आहेत. दरम्यान, दहीहंडीनिमित्त होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी SRPF तुकडीसह 600 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.