संगमनेर । नगर सहयाद्री :-
महायुतीच्या आभार सभेत संगमनेरच्या विकासाबाबत केलेले आरोप अपूर्ण माहितीच्या आधारे असून नवीन लोकप्रतिनिधीकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्यांनी स्पष्ट केले की, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे संगमनेर शहरात पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या कार्यरत असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प सुरळीत असून, 23 कोटींचा नव्याने मंजूर जलशुद्धीकरण प्रकल्प अद्याप थांबवण्यात आला आहे. ही मंजुरी 2 मार्च 2021 रोजी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मिळवली होती.
2022 नंतर सत्तांतर झाल्यावर प्रशासनावर दबाव टाकून विकासकामे थांबवण्याचा प्रयत्न सुरु झाला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचा प्रश्न, अपूर्ण सुविधा या प्रश्नांवर आंदोलने करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. 1991 साली डॉ. सुधीर तांबे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या पाणीप्रकल्पाचा आणि 1992-94 च्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा इतिहास सांगताना, गेल्या तीन दशकांत संगमनेरच्या जलप्रश्नावर सातत्याने कार्य करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसीमधील 155 उद्योग व 6500 रोजगार, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, तसेच नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गे व्हावी यासाठी थोरात व सत्यजित तांबे प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. महायुतीच्या सभेला जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही. वरवर आभार म्हणत खोटे बोल पण रेटून बोल, हीच त्यांची शैली असून, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही चुकीची माहिती देऊन संगमनेरची प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
अडीच कोटीचा निधी कोणत्या तालुक्याला गेला?
नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स करता 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यापैकी नवीन लोकप्रतिनिधीने 4.5 कोटी म्हाळुंगी पूला करता वापरला .मात्र वरचे अडीच कोटी कोणत्या तालुक्याला गेला हे कोणालाच माहिती नाही. येथील विकास मोडण्याचा त्यांचा प्रयत्न असून तालुक्याचा निधी बाहेर पाठवला जात आहे. हे सुद्धा दुर्दैवी असल्याची टीका किशोर पवार, नितीन अभंग व सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.