अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक पिकअप वाहन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात २६ परप्रांतीय मजूर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.कर्जत-कुळधरण-श्रीगोंदा मार्गावर, नेवसे यांच्या डेअरीसमोर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४२ एक्यू ५९४३ या क्रमांकाच्या पिकअपमधून परप्रांतीय मजूर आठवडे बाजारासाठी कर्जत येथे येत होते. यावेळी पिकअपचे एक्सेल तुटल्याने चालक अशोक दत्तात्रय धांडे (वय ४०, रा. जामदारवाडा, ता. कर्जत) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन उलटले. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉ. सागर कोल्हे, डॉ. विद्या व्हरकटे आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले.
गंभीर जखमींपैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. उर्वरित जखमींवर कर्जतमध्ये उपचार सुरू आहेत. शेतकऱ्यांनी मुरघास (गोठ्यांसाठी चारा) करण्यासाठी या मजुरांना मध्य प्रदेशमधून बोलावले होते. सोमवारचा आठवडे बाजार असल्याने मजूर पिकअपमधून कर्जतकडे येत असताना हा अपघात घडला. जखमींमध्ये लहान मुलं, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती मिळत आहे.