आमदार संग्राम जगताप यांची लक्षवेधी | मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्या व गो तस्करी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असून त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते गो हत्या करतच आहेत. अशांवर मकोका सारख्या कडक कायदेशीर कायद्याने कारवाई करण्याची मागणी करत सरकारचे लक्ष वेधले.
आमदार जगताप यांच्या या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्यावर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झाले तर आता त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी मोठी घोषणा करत निर्देश देत असल्याचे सांगत आमदार संग्राम जगताप यांची लक्षवेधी सूचना त्वरित मान्य केली. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही चर्चेत भाग घेतला.
आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी विधिमंडळात गोहत्या व गो तस्करी बाबत महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली. अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुक्यात घडलेल्या घटनेचा आधार घेत त्यांनी ही लक्षवेधी मांडली. आमदार जगताप म्हणाले, 02 नोव्हेंबर 2024 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे फटाके वाजविण्यावरून झालेल्या भांडणात गो तस्करी करणाऱ्या अतिक कुरेशी याने केलेल्या मारहाणीत राम ससाणे यांचा मृत्यू झाला होता. गो हत्या व तस्करी तसेच गुटख्याची तस्करी करणाऱ्या अतिक कुरेशी गँगची असलेल्या दहशतीमुळे कोणीही या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पुढे आले नाही. पोलिसांनीही घटनेकडे दुर्लक्ष केले. या कुरेशीवर गो हत्येचे अनेक गुन्हे दाखल असूनही त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाहीये, असे सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच उत्तर दिले. ते म्हणाले, जर एखाद्यावर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झाले तर त्याच्यावर आत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश देत आमदार जगताप यांची मागणी लगेचच मान्य केली. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही श्रीगोंदा येथे घडलालेल्या मारहाणी घटने संदर्भात गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे सांगितले.
नगरमध्ये गोहत्या, तस्करी करणाऱ्यांची मोठी दहशत
आमदार संग्राम जगताप यांनी गो हत्या व तस्करी करणाऱ्यांची मोठी दहशत अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे गो हत्या व तस्करी करणाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते जेलमधून जामिनावर सुटतात व पुन्हा पुन्हा हाच गुन्हा करत असतात. त्यामुळे अशांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने जसा लव्ह जिहाद साठी कायदा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच गो हत्येचे वारंवार गुन्हे दाखल झालेल्यांवरही कारवाईसाठी मकोका, एमपीडी या सारखे कडक कायदे आणावेत. तसेच श्रीगोंदा येथे घटनेत सरकारने लक्ष घालून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.