Agriculture Minister Controversy: माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४ तासात भरून काढली आहे. राज्याचे नव्याने नियुक्त झालेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे त्यांच्या पहिल्याच सार्वजनिक भाषणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महसूल दिनाच्या निमित्ताने इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात.” असे विधान केल्यामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महसूल विभागाकडून पारदर्शक व प्रामाणिक कारभार अपेक्षित असताना, मंत्र्यांचे हे विधान अनेकांना खटकले आहे.
कृषिमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून अवघे २४ तास होत नाही, तोच भरणे यांच्या या विधानामुळे विरोधकांना टीका साधण्याची संधी मिळाली आहे. महसूल दिनासारख्या कार्यक्रमात अशा प्रकारचे विधान करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यक्रमात पुढे बोलताना भरणे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर वेळेवर निर्णय घेण्याचे आणि शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही दिले.