अहिल्यानगर / नगर सह्याद्री
भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुका परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी, ‘अपहृत’ पती, त्याची पत्नी, वडील, सासू आणि सासरे अशा एकूण पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द पोलिसांनीच याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २५ ऑक्टोबर रोजी हातवळण (ता. अहिल्यानगर) येथून तुकाराम महादेव यादव याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम महादेव यादव (आरोपी क्र. १) याचे मुळात अपहरण झालेच नव्हते.
त्यानेच हा संपूर्ण बनाव रचला आणि यामध्ये त्याची पत्नी सुमन तुकाराम यादव, वडील महादेव सावळेराम यादव (दोघे रा. हातवळण), सासरे रामदास उध्दव सोनसाळे व सासू सिंधुबाई रामदास सोनसळे (दोघे रा. शेंडी) यांनी त्याला साथ दिली. या सर्वांनी संगनमत करून तुकाराम याला लपून राहण्यास मदत केली.
एवढ्यावरच न थांबता, आरोपी सुमन यादव हिने पोलीस ठाण्यात एक वाढीव तक्रार (हकीगत) दिली. यामध्ये तिने, “गणेश कवडे, माऊली पठारे, सुनिल दिलीप पठारे व अक्षय भंडारे (सर्व रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा) यांनी आपल्या पतीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने उचलून नेले,” अशी खोटी माहिती दिली.
या चौघांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी व त्यांचे मोठे नुकसान व्हावे, याच उद्देशाने हा संपूर्ण खोटा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक भरत बाजीराव धुमाळ यांनी स्वतः याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून, नगर तालुका पोलिसांनी आरोपी तुकाराम यादव, सुमन यादव, महादेव यादव, रामदास सोनसाळे आणि सिंधुबाई सोनसळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



