अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील अतिक्रमणे व खासगी जागेत पत्र्याचे शेड उभारून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. कारवाई सुरू झाल्याशिवाय हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पारिजात चौकातील पत्र्याच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली. जेसीबीच्या साहाय्याने चार गाळे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी जागा मालक व गाळेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत सर्वांना बाजूला केले. मंगळवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली.
अनाधिकृतपणे बांधकामे करून, अतिक्रमणे करून जागा बळकवण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यावर तत्काळ कारवाई सुरू करा, अशी मागणी करत आमदार जगताप व त्यांच्या समर्थकांनी आयुक्त दालनात ठिय्या दिला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अनिकेत बल्लाळ व अभियंता सुरेश इथापे यांच्यासह मनपाचे पथक पारिजात चौकात पोहोचले. गाळेधारकांनी कारवाईला विरोध केला. आयुक्तांशीही चर्चा केली. गाळे खाली करण्यास गाळेधारक तयार नसल्याने अखेर पथकाने जेसीबीच्या साहाय्याने चार गाळे जमीनदोस्त केले.
या जागेत सुमारे 15 ते 16 अनधिकृत पत्र्याचे शेड असून उर्वरित गाळे काढण्यासाठी मंगळवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनपाने कारवाई सुरू करताच जागामालक व गाळेधारकांनी गाळे खाली करण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. मात्र, आम्हाला कारवाईचे आदेश असल्याचे सांगत पथकाने कारवाई सुरूच ठेवली. गाळेधारकांनी जेसीबीवर चढून, आडवे येऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना बाजूला केले.
काही गाळेधारक व पोलिसांमध्ये झटापटही झाली. मात्र, कारवाई सुरूच ठेवण्यात आली. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांना यापूवच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार शहरात कारवाई सुरू आहे. पारिजात चौकातील अनधिकृत गाळ्यांना यापूवच नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.