सुपा । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यात मान्सून पुर्व पावसाने मंगळवार (दि.२७) रोजी ढग फुटी सदृष्य हजेरी लावत दमदार बॅटिंग केली. या ढगफुटी सदृष्य पावसाने ओढे नाले ओसंडून वाहू लागले. तर शेतकऱ्यांच्या शेतात मुगार पडल्याने माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.
चालू वर्षी उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवत होती, उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअस वर चढल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाले. सलग आठ ते दहा दिवस पडलेल्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी दि. २७ रोजी पुन्हा सकाळी ढग दाटून आले होते. वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. दुपारी बारा नंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने पारनेर शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरले.
तर सुपा येथील मेन चौकातील गटार तुंबल्याने नगर-पुणे महामार्गावर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. सुपा शहरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. बाजारतळ व सुपा बसस्थानकात पाणी आल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. नगर-पुणे महामार्गावर चालकांना गाड्या काढतांना मोठी कसरत करावी लागली.
तर वाळवणे रस्त्यावर पुल झाल्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने वाहतुकीला अडथळा न होता नागरिकांना ये-जा करता आल्याने समाधान व्यक्त केले. तालुक्यात ढगफुटी सदृष्य पावसाने हंगा नदीला वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी आले. तर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
दरम्यान, चालू वर्षी मे च्या पहिल्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांनी महागडे बी बियाणे खरेदी केली आहेत. वापसा होताच शेतीची कामे उरकून खरीप हंगामातील कांदा, मुग, वाटाणा, तुर, जनावरांसाठी मका, कडवळ, घास आदींची पेरणी करण्यात येणार आहे. तर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात विजेचा खेळखंडोबा
गेली पंधरा दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून सुपा परीसरातील महावितरणचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पाऊस सुरू होताच महावितरण कडून विद्यूत पुरवठा बंद केला जातो. यात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुपा, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस, रूईछत्रपती, बाबुर्डी, अपधूप येथील वीजपुरवठा खंडित झाला असता विविध कंपन्यांचे टावर देखील बंद होतात. पर्यायी गावच रेंजच्या बाहेर असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान
तालुक्याच्या उत्तर भागातील म्हसोबा झाप, गुरेवाडी, शिक्री कामटवाडी, पोखरी, वारणवाडी, देसवडे, मांडवे खुर्द, पळशी, तास, वनकुटे, वडगाव सावताळ, वासुंदे आणि तिखोल या गावांमध्ये टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, गेल्या 10 ते 12 दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाने टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या फळांवर रोगराई पसरली आहे. अनेक ठिकाणी फळांना भेगा पडल्या असून, काही ठिकाणी फळे पूर्णपणे सडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे, शिवाय मेहनतीवर पाणी फिरले आहे. यंदा टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा बाळगणारे शेतकरी आता हवालदिल झाले आहेत. बाजारात टोमॅटोच्या भावातही मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. काही ठिकाणी मागणी कमी झाल्याने भाव कोसळले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. आमच्या गावात टोमॅटो हे मुख्य नगदी पीक आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आणि मेहनतीने हे पीक घेतले होते, पण अवकाळी पावसाने सगळे नष्ट केले. फळांवर रोग पसरल्याने उरलेले पीकही वाया जाण्याची भीती आहे. बाजारात भावही स्थिर नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सरपंच प्रकाश गाजरे व युवा शेतकरी गणेश पारधी यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे मेंढपाळांचे हाल
तालुक्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मेंढपाळांचे जनजीवन मोठ्या अडचणीत आले आहे. पारंपरिक स्थलांतराच्या मार्गावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने मेंढपाळांना एका शेतातून दुसऱ्या शेतात मेंढ्या हलवणे अत्यंत कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे मेंढपाळांच्या दैनंदिन हालचाली पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. पावसामुळे मेंढपाळांचे तात्पुरते निवासस्थानही पाण्याखाली गेले असून, झोपड्यांमध्ये पाणी साचल्याने रात्रीचा थांबाही अस्वस्थ करणारा ठरतो आहे. सततच्या पावसामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील मेंढपाळ अत्यंत चिंतेत पडला आहे. शासनाने त्वरीत हस्तक्षेप करून या संकटात अडकलेल्या मेंढपाळांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन योग्य त्या मदतीची घोषणा लवकर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.