Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला गेला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार होती. मात्र, नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ही रक्कम कमी करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या महिलांना दोन्ही योजनांचा पूर्ण लाभ देता येत नसल्याने शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसारच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही नवीन घोळ किंवा गोंधळ झालेला नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये मिळण्याचे निकष ठरवताना शासनाने २८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयांनुसार, इतर कोणतीही सरकारी योजना न घेतलेल्या महिलांनाच पूर्ण १५०० रुपये दिले जातात. पण ज्या महिलांना इतर योजनांचा काही हिस्सा मिळतो, त्यांना फक्त फरकाची रक्कम म्हणजे ५०० रुपये दिले जात आहेत. त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहिना १००० रुपये लाभ घेणाऱ्या सुमारे ७.७ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून उर्वरित फक्त ५०० रुपयांचाच सन्मान निधी मिळणार आहे. यामध्ये एकाही पात्र महिलेला योजना बंद करण्यात आलेली नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
योजनेबाबत विरोधकांकडून सातत्याने अपप्रचार करण्यात येतो आहे, असे म्हणत अदिती तटकरे यांनी या मुद्यावर सरकारची बाजू मांडली. त्यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून त्याची नोंदही घेतलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही तटकरे यांनी म्हटले. या योजनेंतर्गत महिलांना दरमहिना स्थिर सन्मान निधी देण्याचा उद्देश कायम ठेवण्यात आलेला असून शासन धोरणात कोणताही गोंधळ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.