अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार तीन दिवस उष्ण व दमट हवामानाचा अंदोज वर्तविण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट सांगितला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली आहे.
राज्यात उष्णतेची लाट सांगितली आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 17, 18 व 20 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना उष्मा लाटेमुळे उदभवणा-या उष्माघातानी मानव, पशु-प्राणी यांचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा, सुर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, काम करीत असतांना टोपी किंवा रुमाल बांधावा, गुरांना / पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे, रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
गरोदर स्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी, उन्हात अतिकष्टाचे कामे करु नका, दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका, दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. नागरीकांनी उष्माघाताचे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा. उष्मालाटेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.