छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे असतानाही सक्षम यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला न्याय मिळवण्यासाठी तीन महिने संघर्ष करावा लागला. अखेर सातत्याने प्रयत्न केल्यानंतर १५० जणांवर गुन्हा दाखल करून संपूर्ण वऱ्हाड तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री भरत घावटे (ठुबे) यांना बालविवाहाची होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधला. मात्र विवाहाचे ठिकाण माहीत नसल्याने लग्न थांबवणे अशक्य झाले. विवाहपार पडल्यानंतर नागरिकांनी जयश्री ठुबे यांना फोटो पाठवले.
दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैठण तालुक्यातील एका गावी हलवण्यात आल्याची माहिती उजेडात आली. त्यानंतर स्नेहालयसंस्थेच्या उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तातडीने चाइल्ड हेल्पलाईन १०९८, उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प हेल्पलाईन ९०११०२६ ४९५ वावर संपर्क करावा, असे अवहान जयश्री ठुबे यांनी केले आहे.
याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल समाधान चराटे यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात १५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाईसाठी उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सोशल वर्कर पूजा दहातोंडे, गंगापूर पोलीस, यांनी महत्वाची भूमिका बजावली.