अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची अचानक बदली करण्यात आल्याने शाळेतील पालक, विद्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली होती. संस्थेच्या या निर्णयाविरोधात पालक संघ समितीने अहिल्यानगर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर आजपासून (दि.१ जुलै) बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.
विद्यार्थ्यांनीही शाळेत न जात शाळा बंद ठेवत यात सहभाग नोंदवला. लंके हे गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेत कार्यरत असून त्यांच्या दूरदृष्टी, काटेकोर प्रशासनशैली, विद्यार्थ्यांप्रती कळकळ, व परिणामकारक नेतृत्वामुळे शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव यश संपादन केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबवलेले उपक्रम, मार्गदर्शन आणि कौशल्यवर्धनाच्या योजना यामुळे पालकवर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
लंके सरांचं या शाळेत असणं म्हणजे आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी संरक्षण आहे. त्यांच्या जाण्याने शाळेचा पाया कमकुवत होईल अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता लंके यांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत रयतेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु राहणार असल्याचे पालक समितीमधील सदस्यांनी सांगितले.