पारनेर । नगर सहयाद्री:-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार मी पहिल्या दिवसापासून या बँकेच्या सोबत आहे. बँकेच्या प्रचार फलकावर माझा आणि खासदारांचा फोटो आहे, याचा अर्थ सहकारात राजकारण नको. ही बँक पारनेरकरांची अस्मिता आहे. बँकेने अनेकांना आधार दिला, रोजीरोटी आणि व्यवसायासाठी भांडवल पुरवले. भविष्यात शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय संकल्पनाम्याद्वारे जाहीर करण्यात आला आहे. असे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्याची अस्मिता असलेल्या जी.एस. महानगर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रचारार्थ पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयात भव्य सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी आ. काशिनाथ दाते होते, तर पॅनल प्रमुख गीतांजली शेळके उपस्थित होत्या. आमदार काशिनाथ दाते यांनी जी. एस. महानगर बँकेच्या स्थापनेचा आणि तिच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, ही बँक पारनेर तालुक्याची खरी अस्मिता आहे. स्वर्गीय गुलाबराव शेळके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मुंबईत रात्रीचे शिक्षण घेऊन वकीलीतील सर्वोच्च पदवी मिळवली आणि सर्वसामान्यांसाठी अथक संघर्ष केला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्थापन केलेली ही बँक नगर, पुणे आणि मुंबई जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरली आहे. गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर उदयराव शेळके यांनी बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली, ज्यामुळे ती आजही मजबूत आहे
आ. दाते पुढे म्हणाले, ही बँक फक्त आर्थिक संस्था नसून, पारनेरकरांचा अभिमान आहे. आता या निवडणुकीत बँकेचे भवितव्य कोणाच्या हाती सोपवायचे, हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आपण सर्वांनी एकत्र येऊन गुलाबराव शेळके आणि उदयराव शेळके यांच्या मूल्यांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला न्याय देणारा निर्णय घेतला पाहिजे. ही बँक सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील, यासाठी माझा पाठिंबा गीतांजली शेळके यांच्या पॅनलला आहे.
या सभेला जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, लक्ष्मण गाजरे, सी. बा. अडसूळ, भास्कर खोसे, भास्कर कवाद, माजी सभापती गंगाराम बेलकर, प्रभाकर कवाद, वसंत चेडे, शिवाजी बेलकर, रामदास शिंदे, ज्ञानदेव लंके, अशोक कटारिया, सरपंच पंकज कारखिले, वसंतराव कवाद, लहू थोरात, बाळासाहेब शेरकर, ठकाराम लंके, बाळासाहेब लामखडे, सुभाष खणकर, जालिंदर खोसे, शिवाजी औटी, विठ्ठल कवाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी आ. काशिनाथ दाते आणि गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखाली जी. एस. महानगर बँकेच्या पारनेर शाखेपासून वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांनी मोठी मिरवणूक काढण्यात आली. सभास्थानी दिवंगत सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि ॲड. उदयराव शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी बँकेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या योगदानाची 10 मिनिटांची चित्रफीत दाखवण्यांत आली.
अकरा कलमी जाहीरनामा पारदर्शक
सभांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या कार्याला बळ देत आहे. अकरा कलमी जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही पारदर्शक आणि जनताभिमुख कारभार करणार आहोत. सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व उदयराव शेळके साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून डिजिटल बँकिंगला प्राधान्य देणार आहोत. सभासदांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.
– गीतांजलीताई शेळके, पॅनल प्रमुख, सॉलिसिटर गुलाबराव शेळके पॅनल
कुटुंबातील निवडणूक चुकीची: सी. बा. अडसूळ
आतापर्यंत विरोधकांशी निवडणूक व्हायची, पण आता कुटुंबातच निवडणूक होत आहे, हे चुकीचे आहे. आर्थिक संस्थेचे व्यवस्थापन काचेच्या भांड्यासारखे आहे, त्याला तडा जाता कामा नये. गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. सहकारी भावनेने स्थापन झालेल्या या बँकेचा वटवृक्ष जपण्याचे काम आम्ही करू, असे ज्येष्ठ मार्गदर्शक सी. बा. अडसूळ यांनी जाहीरनाम्यात नमूद केले.
गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास
गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी सांगितले की, बँकेची स्थापना सहकारी भावनेने झाली आणि ती आज वटवृक्ष बनली आहे. ती जपण्याचे काम गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. त्यामुळे या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्याच पॅनलला मतदान करावे असे आवाहन यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी केले.