Crime News: एका शांत गावात घडलेल्या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. मध्य प्रदेशातील टिकमगढ येथील रहिवासी असलेल्या रचना यादव (वय अंदाजे ३५) यांची गावच्या माजी सरपंचाने लग्नासाठी दबाव टाकल्याच्या कारणावरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही भीषण घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. रचना यादव आणि झाशीतील एका गावचे माजी सरपंच संजय पटेल यांच्यात गेल्या काही काळापासून घनिष्ट संबंध होते. मात्र, रचना सतत लग्नासाठी आग्रह धरत होती. या दबावातून सुटका मिळवण्यासाठी संजयने आपल्या पुतण्याच्या मदतीने तिची हत्या करण्याचा अमानुष कट रचला.
हत्या केल्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे करून पोत्यांमध्ये भरले गेले व त्यानंतर ते तुकडे विहिरीत व पुलाजवळ फेकण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याला विहिरीतून येणाऱ्या दुर्गंधीची जाणीव झाली, आणि त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि दोन पोत्यांमध्ये मानवी अवयव आढळून आले. विशेष तपास पथकांनी १७ ऑगस्ट रोजी महिलेचे हात विहिरीतून शोधून काढले, तर लाखेरी नदीतून तिचे डोकेही सापडले. १८ ऑगस्ट रोजी शवविच्छेदनानंतर तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला. रचना यादवची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी हजारो पोस्टर्स प्रसारित केले होते, ज्यामुळे अखेर तिच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली.
या प्रकरणात संजय पटेल व त्याचा पुतण्या संदीप पटेल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा आरोपी प्रदीप अहिरवार अद्याप फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ₹२५,००० चे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच तपास पथकाच्या प्रभावी कामगिरीबद्दल ₹५०,००० चे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. पोलीस तपासात हेही समोर आले आहे की, रचना यादव एका कायदेशीर प्रकरणात अडकली होती आणि त्यात संजय पटेलने तिला मदत केली होती. त्यातूनच दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र, या नात्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीने झाला. सध्या या हत्याकांडामुळे झाशी जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.