सुनील चोभे | नगर सह्याद्री
पावसाला मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास सुरुवात झाली. वालुंबा नदीला पूर आला. तीन वाजेच्या सुमारास पूराच्या पाण्याने घराला वेढा घातला. पाणी वाढत चालले होते. त्यामुळे शेळ्या, जनावरे टॅक्टर ट्रॉलीला बांधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. काही गायी सोडून दिल्या. गायी ट्रॅक्टरला बांधल्या पण पाण्याचा जोर इतका होता की गायीला बांधलेल्या सोलीही तुटल्या. गाया वाहून गेल्या. आम्ही दोघेही 100 ते 200 फूट वाहून गेलो. वारुळाचा आधार घेतला पण पाण्यामुळे वारुळाची माती विघरायची. वारुळ हातातून सटकले…पुढे असलेल्या विद्युत पोलला मिठी मारली. वाहत चाललेल्या सतीषलाही हात देत पोलाकडे खेचले. आम्ही दोघांनीही एकमेकांना सोडले नाही… दोन मुली आणि बायकोनेही ट्रॉलीला तीन तास पकडून ठेवले… तीन-चार तासानंतर आम्हा पाच जणांना लष्कर, ग्रामस्थ, पोलिसांनी रेस्क्यू करत बाहेर काढले असल्याचा थरारक प्रसंग पुरात अडकलेल्या दीपक व सतीष कोठुळे बंधूंनी सांगितला.
अहिल्यानगर शहरापासून 16 किलोमीटर अंतराव दौंड महामार्गावर खडकी गाव आहे. गावासह लगतच्या अकोळनेर, सारोळा कासार, भोरवाडी, चास परिसरात ढगफुटी सदृष पाऊस झाला. त्यामुळे गावातील नदीला पूर आला. आणि पुराचे पाणी गावात शिरले. तर पुराच्या पाण्याने खडकीतील सयाजी कोठुळे, नंदू रोकडे, भाऊसाहेब रोकडे यांच्या घरांना वेढा घातला. पुराच्या पाण्यात दहा जण अडकले होते. पुराच्या पाण्यात अडकलेले दीपक सयाजी कोठुळे, संतोष सयाजी कोठुळे, ज्योती दिपक कोठुळे, कल्याणी ज्ञानदेव कोठुळे, श्रद्धा संतोष कोठुळे, शितल ज्ञानदेव कोठुळे, आरती संतोष कोठुळे, तुषार संतोष कोठुळे, नंदू गंगाधर रोडके, गंगाधर विठोबा रोकडे यांना लष्कर, पोलिस प्रशासन, अग्निशामक दल यांच्या मदतीने रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढले. वालुंबा नदीला एवढे पाणी येईल असे कधीच वाटले नव्हते.
अचानक नदीच्या पाण्याने घराला वेढा घातला. घरातील काही सदस्य तोपर्यंत बाहेर गेले. मात्र माझ्यासह पाच सदस्य पुराच्या पाण्यात अडकलो. गावातील तरुणांनी वेळीच मदत केल्याने आमचा जीव वाचला. नशीब बलवत्तर असल्याने आणि तरुणांच्या उपकाराने आम्ही वाचलो. आतापर्यंत एवढा मोठा पाऊस आणि पूर कधी पाहिलाच नाही. आम्ही भावंड पुरात अडकलो, वाहिलो पण आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. तब्बल तीन-चार तासानंतर पुराच्या पाण्यातून बाहेर पडलो असल्याचे दीपक कोठुळे यांनी सांगितले. यात सतीष कोठुळे जखमी झाले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर, गावातील तरुणांनी मोठे प्रयत्न केले.
यांच्यासह आमदार काशीनाथ दाते, ग्रामीण डीवायएसपी संपतराव भोसले, तालुक्याचे एपीआय प्रल्हाद गिते, संदेश कार्ले, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांच्यासह पोलिस व महसूलचे पथकाने मोठी मदत केली. एपीआय प्रल्हाद गिते यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरुन अडकलेल्या नारिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान पुरात अडकलेल्यांना मदत करतांना संदेश कार्ले जखमी झाले आहेत. दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत द्यावी अशी मागणी वाळकी व खडकी ग्रामस्थांकडून होत आहे.
गायी दगावली, कोंबड्या, संसार पुरात वाहून गेला: भाऊसाहेब रोकडे
अकोळनेर, कामरगाव, भोरवाडी परिसरातून वालुंबा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आली. नदीत पाणी न मावल्याने नदीचे पाणी शेतात शिरले. घरातील धान्य पूर्ण भीजले, संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या, कडबा कुट्टी मशीन, पाण्याच्या चार टाक्या वाहून गेल्या. एक गाय वाहून गेली तर एक गाय दगावली. घरात कंबरे इतके पाणी होते. आयुष्यभर कमावलेे काही क्षणात नाहीसे झाल्याचे पूरग्रस्त भाऊसाहेब बाबासाहेब रोकडे, नभाबाई भाऊसाहेब रोकडे यांनी सांगितले.
व्यावसायिकाचे पाच-सहा लाखांचे नुकसान
वालुंबा नदीला आलेल्या पुराचे पाणी दुकानासह घरात शिरले. घरातील धान्य भीजले. दुकानात दहा फुटापर्यंत पाणी होते. दुकानात ठेवलेले प्लायवूड, काचा, पुठ्ठे भीजले आहेत. सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे व्यावसायिक विकास कोठुळे यांनी सांगितले.
केडगाव, सावेडी, चास, वाळकीत ढगफुटी
नगर तालुक्यात झालेल्या पावसामुळे आणि पूर्वा, वालुंबा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील खडकी, वाळकी येथील गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या पुरामुळे खडकी, वाळकी गावातील घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यात मंगळवारी 50 मिलीमिटर पाऊस झाला. सावेडी महसूल मंडलात 87, कापुरवाडी 52.8, केडगाव 100.5, वाळकी 100.5, चास 118.3 मिलीमिटर पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी 215 मिलीमिटर पाऊस झाला आहे.
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले जखमी
अकोळनेर, चास, भोरवाडी, सारोळा कासार परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे पुर्वा व वालुंबा नदीला पूर आला. या पुरामुळे खडकी गावातील काही घरांना पुराचा वेढा पडला होता. त्यात 10 ते 12 नागरिक अडकले होते. तसेच पुरामुळे नगर-दौंड महामार्ग बंद झाला होता. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुरामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाल्याने शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तात्काळ खडकीच्या दिशेने धाव घेतली. गावात पोहोचल्यानंतर पुराच्या पाण्यात नागरिक अडकल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शथने प्रयत्न केले. ग्रामस्थांचीही मोलाची साथ मिळाली. दरम्यान, पुरात अडकलेल्यांना बाहेर काढतांना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे जखमी झाले आहेत.
वाळकीत एक जण बेपत्ता 78 जनावरे, 168 शेळ्या गेल्या वाहून
मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृष पावसामुळे वालुंबा नदीला आलेल्या पुरात वाळकीतील एक जण वाहून गेल्याची माहिती आहे. तर तब्बल 78 जनावरे आणि 168 शेळ्या वाहून गेल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे आणि फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी केली आहे. तसेच खडकीतील सुमारे 15 गायी वाहून गेल्याची माहिती आहे. वाळकी व खडकीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.