Crime News: सख्ख्या भावांतील वाद इतका विकोपाला गेला की शेवटी एका भावाने दुसऱ्याचा जीव घेतला! शेताच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची तलवारीने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेत शंकर नानाजी येळणे (वय ६९) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा धाकटा भाऊ बाबा नानाजी येळणे (वय ६०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
शेताचा वाद इतका विकोपाला गेला की भावबंदकीच रक्तबंबाळ झाली वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील दिघी शिवारात सदरची घटना घडली. आरोपी बाबा येळणे आणि मृतक शंकर येळणे दोघांचेही शेत आजूबाजूला आहे. घटना घडण्यापूर्वी या दोघांमध्ये शेताच्या धुऱ्यावर वाद झाला. काही दिवसांआधी आरोपी आणि मृतक या दोघांचा लहान भाऊ साहेबराव येळणे याच्या शेतीचे साहित्य चोरीला गेले होते. या साहित्यात डवरे, तिफन, नांगर, पलंग, टेबल, तसेच ओलताच्या दहा पाइपचा समावेश होता. या चोरीची शहानिशा करीत असतांना साहेबराव येळणे याला बाबा येळणे याच्यावर संशय होता. त्यामुळे साहेबरावने मोठा भाऊ शंकर येळणे यांच्यासोबत जाऊन देवळी पोलिसात तक्रार दिली होती.
ही तक्रार मृतक शंकर येळणे याच्या सांगण्यावरून करण्यात असल्याचा बाबा येळणेला संशय होता. त्यामुळे त्याचा शंकर येळणे या मोठ्या भावावर राग होता. शंकर येळणेचा बदला घेण्याबाबत तो आधी बोललाही होता. त्यामुळे हा वचपा काढण्यासाठीच त्याने भावाची हत्या केल्याचे बोलले जात आहे. आरोपीने मोठ्या भावाची तलवारीने सपासप वार करत शेतातच हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तर मृतक शंकर येळणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पुढील तपास देवळी पोलिस करत आहेत.