सुनील चोभे | नगर सह्याद्री
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षबांधणीचे काम नेतेमंडळींनी सुरू केले आहे. त्यातच मातब्बर उमेदवारांना आपल्या पक्षात घेऊन आपल्याच पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह उपनगरातील चार नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा बसणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तीन टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येत असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. तर जानेवारी २०२६ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता धरून स्थानिक राजकारणाला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी नेतेमंडळींना साकडे घातले आहे. तर अनेक जण प्रभागातील आरक्षणाची वाट पाहत आहेत. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकत मोठी आहे. तसेच भाजप व शिंदे सेनेची ताकद आहे.
शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर ठाकरे सेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला. आता सध्या माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, योगीराज गाडे, गिरीश जाधव ही मंडळी ठाकरे सेनेत आहेत. तर काही नगरसेवकांचे तळ्यात मळ्यात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह उपनगरातील चार नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती आहे.
प्रभागनिहाय आरक्षणानंतर उलथापालथ
होऊ घातलेली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढली जाईल असा अंदाज बांधला जात आहे. परंतु, महायुतीत जागा वाटपाचे गणित कसे बसणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जागा वाटपाचे गणित डोळ्यासमोर ठेवून अजित पवार राष्ट्रवादी, भाजप, शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी सर्वच प्रभागांत तयारी चालविली आहे. महाविकास आघाडी एकत्रितच लढणार असल्याचे हे जवळपास निश्चित आहे. ११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होणार असल्याने अनेकांनी सोयीच्या आरक्षणासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. प्रभागनिहाय आरक्षणानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रारुप आरक्षण सोडतीवर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत आहे. ०२ डिसेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यात राजपत्रात जाहीर केले जाणार आहे. अंतिम मतदारयादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात निवडणुक होण्याची दाट शक्यता आहे.



 
                                    
