मुंबई । नगर सहयाद्री:-
महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे आणि कारनाम्यामुळे अडचणीत आले आहेत. धंनजय मुंडे यांना वाल्मिक कराडशी असणारे संबंधांमुळे राजीनामा द्यावा लागला आहे. महायुती सरकारमधील मंत्री, आमदार आणि नेत्यांचे आता कारनामे समोर येत असून यामुळे विधीमंडळात जोरदार चर्चा आणि वाद होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मंत्री पद सोडावं लागलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर केले होते. दरम्यान मंत्री जयकुमार रावल यांच्यावर देखील जमीन हडपल्याचा आरोप आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्यावरही आरोप झाले आहेत. ज्यामुळे हे मंत्री देखील आता अडचणीत आले आहेत.
अशातच आता भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावरही मोठा आरोप करण्यात आला आहे. समाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पडळकर यांनी देवस्थानची जमीन लाटल्याचा आरोप कागदपत्रांसह केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली असून अधिवेशात देखील वाद निर्माण झाला आहे.
आमदार पडळकर यांनी औंध देवस्थानची जमीन लाटल्याचा आरोप समाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. तर याबाबत सर्व कागदपत्रे दाखवताना त्यांनी 34 एकर जमीन पडळकरांनी लाटल्याचा दावा केला आहे. तसेच राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा प्रकार झाला आहे. या मंत्र्यांच्या काळात देवस्थानची जमीन खालसा करण्याचा व्यवहार झाला होता. याच व्यवहारात पडळकरांनी 34 एकर जमीन लाटली, असा दावा खाडे यांनी केला आहे.