पारनेर । नगर सहयाद्री :-
सुपा एमआयडीसी मधील जीएमसीसी कंपनीने आपल्या 152 कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात, म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रशासकीय सूत्रांनी याबाबत माहिती देताना सकारात्मक धोरण असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज मुंगसे यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. त्यांनी कंपनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.जीएमसीसी कंपनीत अडीच वर्षांपूर्वी डिप्लोमा इंजिनिअर पात्रता असलेल्या 152 युवकांची ऑन रोल ट्रेनी म्हणून भरती करण्यात आली होती.
लवकरच त्यांचा तीन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होत आहे. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल, अशी भीती निर्माण झाल्याने कर्मचारी चिंतेत होते. मात्र, कंपनीने ही भीती खोटी ठरवताना स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार नाही. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतांश कर्मचाऱ्यांना चीनमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, त्यांचा अनुभव आणि कौशल्य कंपनीसाठी महत्त्वाचे आहे.
याशिवाय, काही कर्मचाऱ्यांना सुपरवायझरपदी बढती देण्यात आली आहे.मनोज मुंगसे यांनी कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आणि भवितव्याला न्याय मिळाला. आम्ही यापुढेही कामगारांच्या हक्कासाठी लढत राहू,असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे 152 युवकांना मोठा दिलासा मिळाला असून, सुपा एमआयडीसी मधील तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत होईल. कंपनीने घेतलेल्या या सकारात्मक पावलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.