श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा-जामखेड महामार्गावर आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. वळणावर असलेल्या संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिल्यानंतर दुचाकीला लागलेल्या आगीत तांदळी दुमाला येथील बंटी उर्फ विनय संजय धालवडे (वय २५) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी धालवडे व त्यांचा एक सहकारी दुचाकी (क्र. एमएच १६ एयू ७६९९) वरून श्रीगोंद्याहून तांदळी दुमालाकडे जात होते. आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर त्यांच्या दुचाकीने कठड्यास जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला व काही क्षणातच भीषण आग लागली.
या आगीत बंटी धालवडे हे दुचाकीखाली अडकले गेले व आगीत भाजून गंभीर जखमी झाले. त्यांचा सहकारी धडकेनंतर बाजूला फेकला गेला. अपघात होताच जवळच राहणारे अनिल जाधव यांच्यासह कुटुंबातील महिलांनी तत्काळ धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. बंटीला आगीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोपर्यंत ते गंभीर भाजले गेले होते.
जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. बंटी धालवडे यांच्यावर ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील दुसर्या जखमीवरही उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बंटी धालवडे यांच्या अकाली निधनामुळे तांदळी दुमालामध्ये शोककळा पसरली आहे.