लोणी / नगर सह्याद्री –
निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना रविवार दि. 20 एप्रिल 2025 पासून उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळण्याच्याद़ृष्टीने आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणाच्या प्रकल्प अधिकार्यांकडून धरणातील पाणी साठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली. या हंगामातील दुसरे आवर्तन सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची मागणी लाभक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यानुसार धरणातील 2 टिएमसी पाण्याचे नियोजन या आवर्तनासाठी करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांनी सांगितले.
या आवर्तनाचा मोठा दिलासा लाभक्षेत्रातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना मिळणार आहे. कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणारे चौथे आवर्तन असून यापूर्वी आवर्तनाचे पाणी शेवटच्या गावापर्यत मिळेल/ असे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. यंदाच्या आवर्तनातही तसेच नियोजन करून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता अधिकार्यांनी घेण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या आहेत. या आवर्तनातून लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या दूर होणार असून पाणी पुरवठा योजनांसाठी शेती पिकांसाठी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाची मोठी मदत होईल.