मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जगताप यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक विवादास्पद वक्तव्य केले होते.
ते म्हणाले, प्रत्येक नागरिकाने दिवाळीच्या खरेदीसाठी फक्त हिंदू दुकानदारांचीच दुकाने निवडावीत, जेणेकरून दिवाळीचा नफा केवळ हिंदूंनाच मिळेल. सध्या हिंदू मंदिरांवर किंवा हिंदूंवर होणारे हल्ले मशिदींमधून घडत आहेत. या वक्तव्याने सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, भाजपने अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण बिघडवले आहे. संग्राम जगताप 2029 च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षातून नव्हे, तर भाजपमधून लढण्याची शक्यता आहे. भाजपने जगताप यांच्यासाठी राजकीय जाळे पसरले असून, त्यात ते अडकले आहेत. भाजपचे नेते त्यांना पूर्ण पाठबळ देत असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
रोहित पवार यांनी पुढे असा दावा केला की, भाजप केवळ संग्राम जगताप यांच्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक आमदारांना हळूहळू आपल्याकडे खेचेल. 2029 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांसाठी भविष्यात मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
रोहित पवार यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना जन्म दिला आहे. संग्राम जगताप यांच्या वक्तव्यामुळे आधीच निर्माण झालेल्या वादात आता त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा जोडली गेली आहे. यामुळे आगामी काळात अजित पवार गट, शरद पवार गट आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.