श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार व अनियमितता झाल्याचे उघड झाल्यानंतर, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची आणि दक्षता समितीत शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नाशिक यांनी नुकतीच सिन्नर येथील दोन कांदा खरेदी केंद्रांची अचानक पाहणी केली. या पाहणीत खरेदी केलेल्या कांद्याच्या वजनात आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत, निकृष्ट दर्जाचा कांदा, गैरप्रकारांची नोंद यांसारख्या अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचे घनवट यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीतील गैरप्रकारांविरोधात शेतकरी संघटनांनी सातत्याने आवाज उठवला होता. त्यानंतर सरकारने १८ जुलै २०२५ रोजी दक्षता समित्या स्थापन केल्या, परंतु या समित्यांमध्ये शेतकरी प्रतिनिधींचा समावेश नाही आणि समित्यांचे अहवाल वेळेवर सादर होत नाहीत, असा आरोप घनवट यांनी केला आहे. नाफेडच्या अधिकृत सोशल मीडिया (X) हॅंडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘हमीभावाने कांदा खरेदी केली जात आहे’ असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कांद्याला कोणताही ठराविक हमीभाव नसून दर आठवड्याला नवीन दर निश्चित होतो, त्यामुळे ही जनतेची दिशाभूल असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, असे घनवट यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सर्व खरेदी केंद्रांची तातडीने चौकशी करावी, प्रत्येक आठवड्याला नाफेडला कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांची यादी, वजन, वाहन क्रमांक, पत्ता आदि माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, दक्षता समितीत किमान दोन शेतकरी सदस्यांचा समावेश करावा, संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी वेळोवेळी अहवाल प्रसिद्ध करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पणन मंत्री, पणन संचालक व जिल्हाधिकारी नाशिक यांनाही पाठवल्या आहे.