मुंबई । नगर सहयाद्री
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतूनच त्रिभाषा सूत्र राबवण्याच्या निर्णयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडत ठाकरे बंधूंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
शरद पवार म्हणाले, माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती न करण्याविषयी आहे. ५वी नंतर हिंदी शिकण्यात काही हरकत नाही. देशातील मोठा वर्ग हिंदी बोलतो, म्हणून हिंदीला विरोध नाही. मात्र लहान वयात मुलांवर भाषेचा अतिरेक होऊ नये. ठाकरे बंधूंनी हिंदीबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे कुठल्या टप्प्यावर हिंदी शिकवावी आणि कुठे नाही, हे त्यांनी मांडलं. जर ते मातृभाषेच्या बाजूने एकत्र येत असतील, तर ती सकारात्मक बाब आहे, असंही शरद पवारांनी ठामपणे सांगितलं.
राज ठाकरेंनी आवाहन केलेल्या ६ जुलै रोजीच्या मोर्चाला तुम्ही जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ‘हे तुम्ही मला सांगताय पण मला ते माहिती नाही. कुठलाही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. ते म्हणाले इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार आहे, ते बोलू द्या मग निर्णय घेऊ. पण, आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही’, असंही उत्तर शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.