अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर येथील दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत रंगलेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी आणि अंतिम सामन्यादरम्यान दोन धक्कादायक घटना घडल्या. या घटनांमुळे कुस्तीच्या आखाड्यातील खिलाडूवृत्तीला गालबोट लागले आहे.
अंतिम सामन्याआधी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात तुफान राडा झाला. पंचांनी दिलेल्या निर्णयावर नाराज झालेल्या शिवराज राक्षेने संताप व्यक्त करत पंचाला शिवीगाळ करून लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतिम सामन्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला. पंचांच्या निर्णयावर नाराज झालेल्या पैलवान महेंद्र गायकवाडने आपली नाराजी व्यक्त करत थेट मैदानच सोडले. मैदानातून बाहेर जाताना त्याने पंचांना शिवीगाळही केली.
या दोन्ही घटनांनंतर राज्य कुस्तीगीर संघाने तातडीने पाऊल उचलत दोन्ही पैलवानांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. अंतिम सामन्यानंतर पार पडलेल्या कुस्तीगीर संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुढील तीन वर्षे या दोघांनाही कुस्ती खेळता येणार नाही.
याबाबत अधिक माहिती देताना राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस म्हणाले, पंचांनी जो निर्णय दिला होता, त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होते. पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचे कृत्य आहे. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद घातला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारे नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.