Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनने दमदार सुरुवात केली आहे. गुरुवारी राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून, हवामान खात्याने ६ जून रोजीही काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र जनतेला सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट यामुळे काही ठिकाणी अनपेक्षित अडथळे येऊ शकतात. मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून, दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने मुंबईत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. यामुळे किनारपट्टीच्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे, तसेच वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो.
सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, पावसामुळे काही भागांत वीज खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्याशा पावसासह विजांचा अनुभव येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसंदर्भात योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत पावसाचा जोर राहू शकतो, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. बीड, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत मात्र हलकासा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतीच्या दृष्टीने या पावसाचा काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून, वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाऊ शकतो. या भागांमध्ये विजांचा कडकडाट, पावसाचा जोर आणि वाऱ्यामुळे नागरिकांनी घरातच राहणे सुरक्षित ठरेल. प्रशासनाने या संदर्भात आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.