मुंबई । नगर सहयाद्री:-
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाही, पावसानं जोर कायम ठेवला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये पुढील सहा दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात पावसानं मोठं थैमान घातलं आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून, घरं उध्वस्त झाल्याने अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. पाण्यात बुडालेल्या शेतांमध्ये उभं राहून शेतकरी अश्रू ढाळताना दिसत आहेत. शासनाकडून मदतीची मागणी जोर धरत आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुसळधार पावसानं शहरात पाणी साचवून वाहतूक व्यवस्था विस्कळीत केली आहे. हवामान खात्याने येथे देखील पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि रायलसीमा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र: २६ ते २९ सप्टेंबर – कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा येथे अतिमुसळधार पाऊस
गुजरात: २७ ते २९ सप्टेंबर
ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड: २४ ते २७ सप्टेंबर
बिहार: २४ सप्टेंबर
झारखंड, पश्चिम बंगाल: २४-२५ सप्टेंबर
ईशान्य भारत (आसाम, मेघालय, नागालँड इत्यादी): २४ ते २९ सप्टेंबर
दक्षिण भारत (आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, रायलसीमा): २४ ते २८ सप्टेंबर
वादळी वाऱ्यांचा इशारा:
पूर्व आणि मध्य भारतात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये वाऱ्यांचा जोर अधिक असण्याची शक्यता असून, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या सूचना
नदी-नाल्यांच्या किनारी राहणाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी हलाव
शेतीचं नुकसान टाळण्यासाठी पूर्वतयारी ठेवा
विजेच्या तारांपासून दूर राहा
आपत्कालीन सेवा क्रमांक जवळ ठेवा