Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव बाबा यांनी या अपघाताबाबत एक खळबळजनक शक्यता उपस्थित केली आहे. त्यांनी या दुर्घटनेमागे तुर्कीचा आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा हात असू शकतो, असा दावा करत ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर वाढलेल्या भारत-पाक तनावाकडे लक्ष वेधलं आहे. रामदेव बाबा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ही एक नैसर्गिक चूक नव्हती तर एक नियोजित कट असू शकतो. विशेषत: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये भारतविरोधी समन्वय वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे.
रामदेव बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या देखभालीचं काम तुर्कीच्या एका कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं, आणि दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं कंत्राट थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे या कंपनीने सूड घेण्याच्या हेतूने काही तांत्रिक छेडछाड केली असेल का, हा संशोधनाचा भाग असायला हवा. त्यांनी असाही सवाल उपस्थित केला की, तुर्की देशाच्या हस्तक्षेपामुळे भारताच्या हवाई क्षेत्रावर धोका निर्माण होत आहे का? तुर्की किंवा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या घटकांनी विमान अपघात घडवून आणला का? यावर चौकशीसाठी राष्ट्रीय पातळीवर समिती नेमावी, अशी त्यांची मागणी आहे.
रामदेव बाबांनी नमूद केलं की, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला होता. पाकिस्तानला पाठींबा देणाऱ्या तुर्कीने या अपघाताद्वारे सूड तर घेतलेला नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे.दरम्यान, रामदेव बाबांनी उपस्थित केलेल्या या शक्यतेमुळे तपास यंत्रणांवर दबाव वाढला आहे. आता या दाव्यांवर DGCA, CBI किंवा इतर तपास यंत्रणा अधिकृत चौकशी करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.