अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गोरक्षक भारत लिपारे (वय ३९) यांच्यावर ९ जणांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात लिपारे यांची दीड तोळ्यांची सोन्यांची चेन आणि आठ हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली. तसेच, हल्लेखोरांनी लिपारे यांचे हात-पाय बांधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तलवारीसह लाकडी दांडके, बेल्ट, फायटरने मारहाण केली.
याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २९ रोजी घडला आहे. लिपारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आईला दवाखान्यातून घरी आणत असताना त्यांना गोरक्षक मित्राकडून कत्तलीसाठी गाय व वासरू नेणाऱ्या पिकअपची माहिती मिळाली. यानंतर तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकात ते थांबले असता, दोन इसमांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना रविवार पेठेतील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यांना एका घरात डांबून ठेवले, यावेळी हल्लेखोरांनी लिपारे यांचा मोबाईल हिसकावून त्यांच्या पैंटवर पाणी टाकले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तलवारीने हल्ला करून आणि माँब लिचिंगची धमकी देऊन त्यांना जीवघेणी भीती दाखवली.
लिपारे यांनी मित्राला फोनवरून माहिती दिल्याने पोलिसांना याची खबर मिळाली. पोलीस गाडी घटनास्थळी पोहोचताच हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी लिपारे यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केले. लिपारे यांचे मित्रांनी दाखवलेल्या फोटोंवरून हल्लेखोरांची ओळख पटली. यामध्ये शाकीर कुरेशी, इरफान कुरेशी, इरशाद कुरेशी, अरबाज राजू पठाण, अफजल हनिफ कुरेशी, जुनेद शेख, बबलू जब्बार कुरेशी, सलीम माजीद कुरेशी आणि रफीक कुरेशी (सर्व रा. तिसगाव) यांचा समावेश आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
गोरक्षकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून तिसगाव येथील बेकायदा कत्तलखाने जमिनदोस्त करावेत, गोरक्षकास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षा समिती, हिंदू रक्षा युवा मंच आदी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांना देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे किशोर परदेशी, बाळासाहेब गिते, नानासाहेब पालवे, आशुतोष शर्मा, दत्तात्रय गीते, महेश अंतरकर, आदिनाथ लगड, किशन फतपुरे, सोमनाथ बंग, सारंग मंत्री, तेजस पटवा, समर्थ रोडी, रवींद्र मोहिते, राजु हराळ यांच्यासह शेकडो तरुण उपस्थित होते.