जम्मू काश्मीर / वृत्तसंस्था –
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यामुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आता पाकिस्तानचा सूर नरमला आहे. पहलगामवर जो हल्ला झाला, त्याच्या निष्पक्षपाती आणि तटस्थ चौकशीसाठी आम्ही भारताला पूर्णपणे सहकार्य करू, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. ते खैबर -पख्तूनख्वामधल्या काकुल येथे पाकिस्तानी सैन्य आकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पहलगाममध्ये घडलेली दुर्घटना ही सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे, जी थांबवली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र त्यासोबतच त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, भारताने जर आमच्या वाट्याचं पाणी थांबवलं तर आम्ही प्रत्येक पर्यायाचा अवलंब करू, कारण हे पाणी म्हणजे आमच्या देशाची जीवन रेखा आहे. आम्ही त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या राष्ट्रहिताचे संरक्षण करू, आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं याचं प्रत्युत्तर देऊ, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
अशा परिस्थितीमध्ये शांतता ठेवणे हीच आमची प्राथमिकता आहे. पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र आम्ही आमची सुरक्षा आणि अखंडता याबाबत कधीच तडजोड करणार नाहीत. कोणतेही खोटे आरोप करू नयेत, आमच्या देशाच्या सार्वभौमत्त्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत. जर सिंधू नदीचे पाणी बंद करण्याचा किंवा वळवण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देऊ, आमची सशस्त्र सेना तयार आहे, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.