अहिल्यानगर | नगर सह्याद्री
उन्हाचा पारा ४० अंशांच्यापुढे सरकला असून अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागात संचारबंदी सारखे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडताना दिसत नाही. एरवी गजबजलेल्या अहिल्यानगर शहरातील बाजारपेठांसह नगर- पुणे मार्गावर सध्या शुकशुकाट दिसून येत आहे.
नगर-पुणे हा जिल्ह्यातील सर्वात गर्दी आणि व्यस्त असणारा प्रवासी मार्ग आहे. मराठवाड्यात जाण्याचा हा मार्ग असल्याने मुंबई- पुण्यावरून येणारी सर्व वाहतूक या मार्गावरून धावताना दिसते. यामुळे गेल्या काही वर्षात या मार्गावरील अर्थकारण बदललेले आहे. मराठवाड्याकडे जाणार्या खासगी वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बहुसंख्य बसेस या मार्गावर थांबा घेतात. मात्र आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली. सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. या मार्गावरील हॉटेल व्यवसायावरच अनेक गावाचे अर्थशास्त्र अवलंबून असून गेल्या काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी विविध फळांचे उत्पादन, ताजी सेंद्रिय फळे शेताबाहेर स्टॉल लावून विकताना दिसत आहे.
शीतपेय, लस्सी याकडे लहान मुले व तरुणांचा ओढा असला तरी या पेयांना सुद्धा आता पूर्वीसारखी मागणी नाही. त्यातच उन्हाळ्याची तीव्रता व प्रखरता वाढल्याने रस्त्यावर ग्रामीण भागात सध्या शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, उन्हाचा पारा हा ४० अंशाच्या पुढे सरकला असून यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे संचारबंदी सारखी परिस्थिती असून उन्हाच्या झळा आता माणसांसह प्राण्यांना बसताना दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे चित्र असल्याचे दिसत आहे.
श्रीरामपुरात उष्माघाताचा बळी?
अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात काल ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो आहे. लोकच नाही तर पशु-पक्षीही गर्मीने हैराण झाले आहेत. अशातच एका ६५ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील वॉर्ड नं. ७ येथील राजकुमार धरमचंद चुडीवाल (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. भगवान महावीर जयंती जन्मकल्याणक शोभा यात्रेत राजकुमार चुडीवाल सकाळी सहभागी झाले होते. शोभा यात्रेत उन्हाचा चटका लागल्यामुळे ते पाणी प्याले असता त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गौतम साबद्रा यांनी नेत्रतज्ञांचे वतीने केले. त्यांच्या पश्चात पती, दोन बधू, दोन मुले, पुतणे असा परिवार आहे. ते महावीर सप्लायर्सचे अनिल चुडीवाल, पुष्पाबाई रसिकलाल बडजाते तसेच किशोर, संजय, अजय चुडीवाल यांचे बंधू तर जयेश, श्रेयश चुडीवाल यांचे ते वडील होत.