Maharashtra News: राज्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने एकूण 3,720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला असून त्यापैकी 9 मे 2025 पर्यंत 3,126 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
उर्वरित रकमेतील 307 कोटी रुपयांचे वाटप लवकरच होणार असून, 287 कोटी रुपये विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतर वितरीत केले जाणार आहेत. शेतकरी संघटनांनी सरकारकडे लवकरात लवकर दुसरा हप्ता वितरित करण्याची मागणी केली आहे. या भरपाईसाठी चार वेगवेगळ्या ट्रिगरवर आधारित मंजुरी देण्यात आली आहे: स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ₹2,720 कोटी, हंगामातील प्रतिकूल हवामान–₹713 कोटी, काढणी पश्चात नुकसान – ₹270 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान – ₹18 कोटी मंजुरी देण्यात आली.
सध्या स्थानिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल हवामान या दोन घटकांअंतर्गतच भरपाई वाटप सुरू आहे. कारण राज्य सरकारने फक्त पहिल्या हप्त्याचा निधी विमा कंपन्यांना दिला आहे. या अंतर्गत मंजूर एकूण रक्कम 3,433 कोटी रुपये असून त्यापैकी 3,126 कोटी रुपये वाटप पूर्ण झाले आहे. काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान या टप्प्यांतील भरपाईसाठी शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे वाटप राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतरच होणार आहे. स्थानिक आपत्ती अंतर्गत: ₹2,418 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत: ₹708 कोटी, या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असला तरी, उर्वरित भरपाईसाठी तातडीने निधी वितरण करण्याची गरज शेतकरी संघटनांनी मांडली आहे.