Maharashtra Crime News: मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड उर्फ ‘आका’ याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत वाल्मिक कराडने कोणाकडूनही थेट खंडणी मागितली नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र, पोलिसांच्या हाती लागलेल्या नव्या पुराव्याने हा युक्तिवाद धुळीस मिळवला आहे.
वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीकडून मागण्यात आलेली 2 कोटी रुपयांची खंडणी यासंदर्भात पोलिसांना एक ठोस पुरावा मिळाला आहे. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी या व्हिडीओचा उल्लेख केला आहे. यात खंडणीची मागणी कशी झाली आणि कोणाच्या आदेशावर ही मागणी करण्यात आली, याची स्पष्ट माहिती मिळाली आहे.
सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडीओमध्ये सुदर्शन घुले कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगतो की, “100 लोक सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरळीत होईल.”
व्हिडीओमध्ये सुदर्शन घुले हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देताना दिसत आहे. “गेल्यावेळी मी आलो होतो, तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती. ही बाब वाल्मिक अण्णांना समजली आहे आणि ते तुमच्यावर संतापले आहेत. त्यामुळे त्वरित मागणी पूर्ण करा, नाहीतर तुमचे काम बंद केले जाईल,” असे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र आता या नव्या पुराव्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.