मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकांनंतर आता यंदाच्या विधानसभेत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ मोठा धक्का देण्याची शक्यता आहे.
समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना नेते सुहास कांदे यांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे समीर भुजबळ हे तुतारी हाती घेणार किंवा अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेतेही समीर भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार का? की ते वेगळा मार्ग निवडणार हे पहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले होते. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठं यश मिळाले. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना कोणत्या आणि किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.