Maharashtra politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वरिष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वाशिमचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही त्यांनी काही महिन्यांतच पदाचा राजीनामा दिल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आमदार असून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. कोल्हापूर ते वाशिम हा जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास आहे, त्यामुळे त्यांचा बराच वेळ या प्रवासात जात होता. याचा परिणाम त्यांच्या मूळ मतदारसंघातील कामांवर होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील पक्षांमध्ये पालकमंत्रीपदांवरून अजूनही चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत मुश्रीफ यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत.
मुश्रीफ यांच्या निर्णयानंतर वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाला दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही. त्यामुळे वाशिमची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
महायुती सरकारमध्ये काही मंत्री पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्यास इच्छुक नाहीत, तर काहींना पद मिळत नसल्याने नाराजी आहे. हसन मुश्रीफ यांच्या निर्णयामुळे या वादाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाची या संदर्भात भूमिका काय असेल, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.