अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात बुधवार (दि. ११ जून) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने व मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. यामध्ये झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, दहिफळ येथे बैलगाडीवर झाड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव मीराबाई अशोक भोसले (वय ५७) असे आहे. त्या शेतातून बैलगाडीने घरी परतत असताना अचानक वादळात झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ओंकार भोसले (१५), विराज भोसले (२०) आणि मुक्ता भोसले (३३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन दाट ढग आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. शहरटाकळी, दहिगावने, देवटाकळी, मजलेशहर, रांजणी, भावीनिमगाव आदी भागांत वादळामुळे सुमारे १०० हून अधिक झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब व तारा तुटल्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वादळामुळे केळीचे पीक, कांद्याचे शेड आणि अनेक घरांचे पत्रे उडून गेले. सोलर प्लेटचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या केळी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू असून, काही मार्ग वादळानंतर दुपारपर्यंत बंद होते.
शहरटाकळी येथे पंकज पंडित व राजेंद्र बोरुडे यांच्या कारवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. शेवगाव शहरासह परिसरात वीज पुरवठा अद्यापही खंडित असून, वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दहिगावने परिसरात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.