अहिल्यानगर | नगर सह्याद्री
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर ते डिसेंबर 2024) हरित शपथ घटकात अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात पहिल्या क्रमांकावर आली आहे. शहरातील 1,48,895 नागरिकांनी वैयक्तिक तर 2002 ग्रुपने सामूहिकरित्या हरीत शपथ घेतली. माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेने यापूव दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. आता प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून यापूव शहरात सुशोभीकरण व वृक्षारोपण अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले होते. आजही वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होत आहे. नव्याने शहरात उद्याने व हरित क्षेत्र तयार करण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या वापराबाबत, इलेक्ट्रिक वाहन वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत नागरिकांना घरोघरी जाऊन माहिती देण्यात येत आहे. प्रशासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहर सुंदर व हरित शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मागील काळात अहिल्यानगर महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये 1.50 कोटी, 3.0 मध्ये 6.00 कोटी व 4.0 मध्ये 6.00 कोटी अशी एकूण 13.50 कोटी रुपयांची पारितोषिके मिळवली आहेत. या रकमेतून शहरात विविध उद्याने, हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच जनजागृतीपर उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला आहे. येत्या अभियानात पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाचे उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे. त्यातील हरित शपथ घेण्याच्या घटकात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आता इतर घटकांतही नागरिकांच्या सहकार्यातून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला साथ देऊन नगरकरांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.