अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशातच रविवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा अहिल्यानगर शहर हादरले आहे. या घटनेमुळे पुन्हा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने गोळीबार केल्याची घटना घडली.
जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी प्रमोद रामदास घोडके (रा. दत्त मंदीराशेजारी, ढवण वस्ती, तपोवन रोड) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भीमराज आव्हाड, राहुल सांगळे, मयुर फणसे, आकाश नसाणे, कुणाल मराठे (सर्व रा. अहिल्यानगर) यांच्यासह एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद घोडके तपोवन रस्त्यावरील ढवण वस्ती परिसरात कुटूंबासह वास्तव्यास आहे. रविवार दिनांक 1 जून रोजी भाऊ आनंद उर्फ बबलु ढवण याचा वाढदिवस मित्रासह साजरा केला. त्यानंतर सोडबारा वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या इंडो आयरीश हॉस्पीटल, तपोवन रोड येथे डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी गेले. त्यावेळी राजवाडा हॉटेलच्या बाहेर मयुर फणसे व कुणाल मराठे उभे होते. त्यांनी फिर्यादी प्रमोद घोडके यांना आवाज देवुन बोलावले.
तु त्या ऋषी ढवणसोबत का राहतो? तुला किती वेळा सांगितले की, त्या ऋषी ढवण सोबत राहु नको, असे म्हणुन शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करु लागले. तेवढ्यात हॉटेल राजवाडामधुन आकाश नसाणे बाहेर आला. त्यांने देखील मारहाण केली. प्रमोद घोडके यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करत केक कापला तेथे मित्रांजवळ आले. काही वेळातच तेथे राहुल सांगळे व भीमराज आव्हाड आले. तेव्हा भिमराज आव्हाड याने त्याच्या हातातील पिस्टलने दोनदा जीवे ठार मारण्याचा उद्देशाने गोळीबार केला. परंतु सुदैवाने गोळी कोणालाही लागली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार
जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. या हल्ल्यात साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली असून, त्याला अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे (वय 20, व्यवसाय: वॉशिंग सेंटर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी तिथे लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. कुणालच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली, त्यामुळे त्याला प्रथम जामखेड येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले.
गुंडगिरीला चिरडून टाका : आमदार रोहित पवार
गोळीबाराच्या घटनेमुळे जामखेड शहरात भरीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. अशा घटनांमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावे, ही विनंती!